सत्य परिचित – ठाणे (प्रतिनिधी) 05 डिसेंबर : ठाणे शहरातील मनोकामना नगर परिसरात लक्ष्मी टोबॅको दुकानात घडलेल्या धक्कादायक प्रकारात दोन व्यक्तींनी स्वतःला पत्रकार म्हणून ओळख देत गुटखा प्रकरणाचा बहाणा करून दुकानदारावर तब्बल तीन लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, भुजगराव नागराव सोनकांबळे हा व्यक्ती ‘लोकराजा TV’चा पत्रकार असल्याचे सांगत दुकानात घुसला आणि गुटखा शोधू लागला. दुकानात एक पिशवी गुटखा मिळताच त्याने तक्रारदारावर दबाव टाकत थेट ₹3 लाखांची मागणी केल्याचे सांगितले जाते. त्याच्यासोबत आनंद दुबे उर्फ विजय उर्फ ओमकार हा व्यक्तीही उपस्थित होता आणि दोघांनी मिळून खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप आहे.
दुकानदाराने “फक्त एक पिशवी गुटखा आहे, ₹20,000 देतो” असे सांगितल्यावर दोघांनी संतापून त्याला मारहाण केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या मारहाणीत त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होईपर्यंत त्याला मारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून मारहाणीच्या दरम्यान आनंद दुबे हा घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणामागील व्यक्तींची भूमिका, त्यांची पूर्वीची खंडणीवसुलीची शक्य तितकी कार्यपद्धती आणि गुटखा व्यवहारातील कथित सहभाग याबाबत सखोल तपास करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच संबंधित सर्व व्यक्तींवर तत्काळ गुन्हा नोंदवून निष्पक्ष चौकशी करावी, अशी विनंती ठाणे शहर पोलीस उपायुक्तांकडे करण्यात आली आहे.