मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नालेसफाई कामात ठेकेदाराची मोठी हलगर्जी; महापालिकेने ठोठावला १०% दंड

भाईंदर (इरफान सय्यद) : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी करोडो रुपयांचा खर्च केला जात असतानाही प्रत्यक्षात कामात सातत्याने हलगर्जीपणा आढळून येत आहे. यावर्षीही त्यास अपवाद राहिला नाही. नालेसफाईच्या कामात ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महानगरपालिकेने ठेकेदार संस्था मे. आशापुरा कन्स्ट्रक्शन यांच्यावर १०% दंड आकारला आहे.

महानगरपालिकेच्या नोंदीनुसार, पावसाळापूर्व नालेसफाईचे काम २० एप्रिल २०२५ पासून शहरभरात सुरू झाले आहे. मात्र, २० मे २०२५ रोजी आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांनी शहरातील महत्त्वाच्या भागांचा दौरा करत सविस्तर पाहणी केली असता नालेसफाईतील ढिसाळपणा समोर आला.

नालेसफाईचे काम फक्त कागदोपत्री?

महत्त्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी नाल्यातील गाळ पूर्णपणे काढण्यात आलेला नसून, काही ठिकाणी गाळ काढल्याचा दिखावा करून तोच गाळ पुन्हा नाल्यातच डंप करण्यात आल्याचे आढळून आले. मशीनरीचा वापर अपुरा असून, मजुरांमार्फतच सारा भार उचलण्यात आला. परिणामी कामात गुणवत्ता आणि कार्यक्षमता दिसून आली नाही.

ठेकेदारांवर नागरिकांचा रोष

नालेसफाईचे काम हे वर्षानुवर्षे लाखो-कोट्यवधी रुपये खर्चूनही अपूर्ण आणि अपुरेच राहते, असा आरोप नागरिकांकडून सातत्याने होत आहे. अनेक नागरिकांनी सांगितले की, “ठेकेदार फक्त बिल भरण्यासाठी काम करतात. प्रत्यक्षात नाले साफच होत नाहीत. यामुळे पावसात रस्ते जलमय होतात आणि आरोग्य धोक्यात येते.”

महानगरपालिकेची तिजोरी साफ?

नागरिकांचा रोष इतका तीव्र आहे की, ‘नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदारांनी महापालिकेची तिजोरी साफ केली,’ असा थेट आरोप केला जात आहे. हे गंभीर आरोप असून त्याला आता प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे.

महापालिकेची तातडीने कारवाई

या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित ठेकेदारावर पहिल्या देयकातून थेट १०% दंड आकारला आहे. तसेच, भविष्यात यापेक्षा कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे – आयुक्तांचा इशारा

“नालेसफाई हे केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात प्रभावी आणि परिणामकारक असणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाची बाब असून यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे मा. आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी ठामपणे सांगितले.

महानगरपालिका प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना पावसाळ्यापूर्वी काम वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरवासीयांनीही अशा कामावर सतत लक्ष ठेवून आपल्या परिसरात हलगर्जीपणा झाल्यास त्वरित तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मीरा भाईंदर मध्ये प्रदूषण करणारे मेसर्स काँक्रीटटेक RMC Plant बंद करण्याचे आदेश.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) ठाणे प्रादेशिक विभागाने मीरा-भाईंदरमधील आरएमसी प्लांटवर कारवाई…