मिरा-भाईंदर, दि. ६ सप्टेंबर: धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या जाहिरातींचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रकार हा समाजात विभाजन निर्माण करणारा गंभीर गुन्हा आहे. व्यवसायाच्या वाढीच्या नादात समाजातील एकोपा व धार्मिक सहिष्णुतेस बाधा आणणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा विकासकांचे बांधकाम परवाने त्वरित रद्द करावेत, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.

विवादग्रस्त जाहिरात प्रकरणाची गंभीर दखल

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे–घोडबंदर येथील सर्वे क्र. २६/२, २६/३ आणि २७/१० या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या सदनिकांच्या विक्रीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाने धार्मिक भावना दुखावतील, असा आशय असलेली जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या जाहिरातीत वापरलेल्या भाषेचा आणि विचारसरणीचा समाजातील दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असा स्पष्ट इशारा असल्याने, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.

मंत्र्यांकडून तातडीने कारवाईचे आदेश

परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, महानगरपालिका प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार महापालिकेने संबंधित विकासकाकडे स्पष्टीकरण मागवले आहे. जर स्पष्टीकरण समाधानकारक नसेल, तर त्यांच्या बांधकाम परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे स्पष्ट करत मंत्री श्री. सरनाईक यांनी अशा प्रकारांना मुळापासून आळा घालण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

धार्मिक सौहार्द आणि सामाजिक जबाबदारीचं भान ठेवण्याचं आवाहन

या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. सरनाईक यांनी सर्व विकासक, व्यावसायिक आणि जाहिरात कंपन्यांना सामाजिक जबाबदारीचं भान ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
“व्यवसायाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करणं आणि धार्मिक भावना चिथावणं, हे कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही. विकासकांनी त्यांच्या जाहिरातींच्या आशयाबाबत जबाबदारीने वागणं गरजेचं आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी…