सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी), ०३ नोव्हेंबर : “कॅशलेस उपचार”च्या गाजावाजाखाली मिरारोडमधील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक रुग्णालयात रुग्णांची उघड लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
भाईंदर पूर्व येथील सुर्योदयन शंकर रायरन या नागरिकाने धक्कादायक खुलासा करत सांगितले की, कोणताही उपचार न करता रुग्णालयाने त्याच्याकडून तब्बल ₹११,३९१ रुपये वसूल केले. इतकेच नव्हे तर, रक्त तपासणीसाठी अतिरिक्त ₹२,००० घेण्यात आल्याचाही आरोप त्याने केला आहे.
रायरन हे किडनी स्टोनच्या आजाराने त्रस्त होते. ओळखीतील काही जणांच्या सल्ल्यानुसार ते उपचारासाठी मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक रुग्णालयात दाखल झाले. मात्र, तीन दिवस रुग्णालयात ठेवून फक्त रक्त तपासणी करून रुग्णाला बाहेरून औषध घेण्यास सांगण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

यावरून “कॅशलेस उपचार”चा गाजावाजा फक्त नावालाच असून, प्रत्यक्षात सामान्य रुग्णांची लूटमार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नावाने पावती देऊनही एवढी मोठी रक्कम आकारल्याने या प्रकरणाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.