मिरा-भाईंदर महानगरपालिका आवारातील धोकादायक झाड

महापालिका आवारातील धोकादायक झाडावर दुर्लक्ष; आणखी एका दुर्घटनेची प्रशासन वाट पाहत आहे का?

सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी) ८ जुलै :  मिरा-भाईंदर शहरात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गेल्या ४८ तासांत तब्बल ५० पेक्षा जास्त झाडे कोसळल्याची नोंद झाली आहे. शहरात दरवर्षी पावसाळा सुरू होताच झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत असताना, प्रशासनाकडून केवळ फांद्यांची मर्यादित छाटणी करून जबाबदारी संपवल्याचा आरोप होत आहे.

हे झाड सध्या केवळ लोखंडी सुरक्षा जाळीला टेकून उभे असल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाल्यास हे झाड कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. एवढ्या मोठ्या झाडाचा भार ही लोखंडी सुरक्षा जाळी पेलू शकेल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. झाड रस्त्याच्या दिशेने कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.

राई गावातील दुर्घटनेत जीव गेला, तरी धडा नाही?

मिरा-भाईंदर धोकादायक झाड : काही दिवसांपूर्वी भाईंदरच्या राई गावात झाड दुचाकीवर कोसळल्याने एक युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतरही शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याशिवाय, अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वी भाईंदरच्या ६० फूट रस्त्यावर झाड कोसळून दोन महिला जखमी झाल्याची घटनाही घडली. सलग दुर्घटना घडत असतानाही सर्व धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि आवश्यक उपाययोजना वेळेत झाल्या का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मनसेचे आंदोलन, वृक्ष अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

धोकादायक झाडांची वेळेत छाटणी आणि पाहणी न झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिकेत आंदोलन केले होते. या आंदोलनात वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी नागेश वीरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी अंगावर झाडांच्या फांद्या लटकवून निषेध नोंदवत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

झाडे दोषी की चुकीचे नियोजन?

पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे की, शहरात अनेक वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या काही परदेशी प्रजातींच्या झाडांची मुळे उथळ असतात. त्यातच झाडांच्या बुंध्याभोवती मोठ्या प्रमाणावर काँक्रीट आणि डांबरीकरण करण्यात आल्यामुळे मुळांना जमिनीत खोलवर वाढण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यात अशी झाडे सहज उन्मळून पडतात.

मिरा-भाईंदर शहरातील अनेक रस्त्यांवरही झाडांच्या बुंध्याभोवती काँक्रीट आणि डांबर करण्यात आल्याचे दिसून येते. वृक्षसंवर्धनाचे मूलभूत निकष पाळले जात आहेत का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, धोकादायक झाडांबाबत कारवाईची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसांपूर्वी वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी नागेश वीरकर यांच्या विरोधात महानगरपालिकेत आंदोलन केले होते. मात्र आंदोलनानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नसल्याची टीका होत आहे.

मनसेचे सचिन पोपळे यांचा सवाल

“राई गावात एका तरुणाचा जीव गेला, ६० फूट रस्त्यावर महिला जखमी झाल्या, ४८ तासांत ५० पेक्षा जास्त झाडे कोसळली, तरी महापालिका आवारातच धोकादायक झाड तसंच उभं आहे. आणखी एखादा नागरिक बळी गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार आहे का?” असा सवाल मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी केला.

नागरिकांच्या जीवाशी खेळ नको

झाडे शहराची शान आहेत; मात्र चुकीची प्रजाती, अपुरे नियोजन आणि मुळाभोवती केलेले काँक्रीटीकरण यामुळे तीच झाडे जीवघेणी ठरत असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. आणखी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी महानगरपालिकेने शहरातील सर्व धोकादायक झाडांचे तातडीने संरचनात्मक परीक्षण करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

You May Also Like

भाईंदरमध्ये नवघर पोलिसांची मोठी कारवाई; अल्पवयीन मुलीची खरेदी-विक्री करणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ८ आरोपी गजाआड

भाईंदरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ८ नराधम गजाआड! सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी)…